वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते बाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत.
आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, जीवनाची ही टोके सांधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोषी असते.