खालील उतारा वाचून विचारलेला प्रश्नांचा उत्तर द्या.
ग्रीष्मऋतुत येणारे प्रमुख फळ म्हणजे आंबा. आंब्याच्या विशिष्ट स्वादामुळे त्याला फळांचा राजा म्हणतात. मंगलकार्य, सण, उत्सव, देवपूजा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला खूप महत्त्व आहे. हा वृक्ष सर्वसाधारणपणे सहा ते पंधरा मीटर उंच असतो. झाड डेरेदार आणि भरपूर सावली देणारे असते. आंब्याच्या आपल्या देशात 700-800 जाती आहेत. आंब्याचा मोहोर, कैरी, पिकलेला आंबा, आंब्याची कोय, पाने, झाडाची साल ह्या सर्व गोष्टींची आयुर्वेदाच्या दृष्टीने वेगवेगळी उपयुक्तता आहे. आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या साठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे. आंब्यातील अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. असा हा आम्रवृक्ष सदाबहार, सदाहरीत आणि विपुल फळे देणारा आहे. हा वृक्ष दीर्घायू आहे त्यामुळे देवपूजेत आणि मंगल कार्यात त्याला विशेष महत्व आहे. अर्थाजनाच्या दृष्टीनेही आंब्याचे महत्व खूप आहे. कैरीचे लोणचे, मुरंबे, सरबत, आमचूर पावडर तर आंबापोळी, आंब्याचा गोळा, आंबा बर्फी असे विविध पदार्थ आंब्यापासून केले जातात. आम्रवृक्ष शुभ, पवित्र, मांगल्यदर्शक आणि आरोग्यदायी आहे.
आंब्याच्या पानांचा काय उपयोग आहे?