पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
करोनाने मानवी जीवनाच्या सर्व बाजूंवर प्रभाव टाकला आहे. करोनामुळे शाळा बंद आहेत. पण याचा परिणाम मुलांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक आरोग्यावर झाला आहे. त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. ऑनलाइन वर्गाध्यापनात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद महत्त्वाचा. यादृष्टीने ऑनलाइन शिक्षणाचे कोणते माध्यम उपयुक्त ठरेल याचा विचार करू लागलो. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नाहीत, आभासी विश्वातून त्यांच्याशी संवाद करायचा आणि अध्यापन प्रक्रिया यशस्वी करायची याचा ताण जसा आमच्यावर होता तसाच अर्थात तो विद्यार्थ्यांवरही होता. शाळा बंद असली तरी मुलांचे शिक्षण सुरू राहिले पाहिजे यासाठी मुलांबरोबरच पालकांशीही संपर्क साधून त्यांना समजावून सांगितले. आता प्रत्यक्ष शाळा भरणार नाही, परंतु ऑनलाइन शिक्षण हा त्याला पर्याय आहे. मुलांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्या म्हणून विनंती केली. ज्यांना आर्थिक अडचणी होत्या अशा मुलांची यादी बनवून त्यांना काही मदत करता येईल का, याचाही विचार सुरू झाला. मात्र अडचण अशी होती की, घरात स्मार्टफोन एकच आणि शिकणारी अपत्ये दोन किंवा तीन. तेव्हा पालकांशी व मुलांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सोयीचे वेळापत्रक बनवण्यात आले.
मुलांशी चांगला संवाद झाला पाहिजे, या नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांना करता आला पाहिजे सुरुवातीस ऑनलाइन वर्गास कमी प्रतिसाद मिळत होता. तेव्हा पुन्हा कारणांचा शोध घेतला. स्मार्टफोनची उपलब्धता असणाऱ्या मुलासोबत दोन-दोन मुलांचा गट बनवून एकत्रितरीत्या ही मुलं वर्गाला उपस्थित राहू लागली. को-लर्निंगच्या मदतीने ही मुलं शिकू लागली. सुरुवातीला चांगला सराव झाल्याने म्युट, अनम्युट करणे, स्क्रीन शेअर करणे, चॅट बॉक्स पाहणे, त्यात प्रश्न अथवा उत्तरे लिहिणे त्यांना जमायला लागले. माझा अध्यापनाचा विषय मराठी भाषा असल्याने कठीण शब्द, त्यांचे अर्थ, शुद्धलेखन, व्याकरण, स्वाध्याय, लेखन आदीसाठी मला व्हाइट बोर्डचा उपयोग झाला. मुलांनाही आपण प्रत्यक्ष वर्गात शिकत आहोत याचा 'फील' यायला लागला.
आमच्या शाळेतील बहुसंख्य मुलं ही चाळीत राहणारी आहेत. चाळीतील घरं लहान आणि दाटीवाटीची असतात. फेरीवाले, भटके कुत्रे, आपसात बोलणारी माणसं, लहान मुलं यांचा गोंगाट कानावर आदळत असतो. अशावेळी मुलांना म्यूट करणं एवढाच पर्याय हातात असतो. मुलांचे व्हिडीओ ऑन असल्याने ती दिसतात. मुलांना अगोदर सूचना दिली आहे की, एखादा शब्द नाही समजला की लगेच हात वर करायचा. फॉर्मच्या मर्यादा लक्षात घेऊन मुलांचा लेखन सराव अधिक वाढावा म्हणून स्वाध्याय, कृतिपत्रिका, निबंध, पत्र, व्याकरण लेखन करण्याच्या सराव पत्रिका नियमितपणे मुलांकडून सोडवून घेतल्या जातात. यामुळे लेखनाचा वेग कायम टिकून राहतो.
तथापि विद्यार्थी तासन् तास स्मार्टफोनच्या छोटय़ा स्क्रीनवर डोळे लावून बसत असल्यामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. जास्तीच्या स्क्रीन टाइममुळे मुले चिडचिडी झाली आहेत. डोकेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाल्याने 'शिक्षणातून सर्वांगीण विकास' ही संकल्पना लोप पावत आहे. आमच्या शाळेत शिकणारी काही मुलं मात्र आर्थिक अडचणीमुळे लहान-मोठी कामं करून पैसे कमावताहेत, ज्याचा पालकांना आधार होतो आहे. परंतु ही मुलं पुन्हा शाळेत येतील का, असा प्रश्न मला पडतो. आर्थिक विषमतेबरोबरच शैक्षणिक विषमता वाढीस लागली आहे. यामुळे सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करावा. हे नाही झाले तर आपण एक पिढी हरवून बसू..'