पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
मानवाची प्रगतिशील होण्याची त्याची धडपड आणि आजपर्यंत त्याची झालेली प्रगती हे लक्षांत घेता त्याची प्रवाहित राहण्याची क्षमता लक्षात येते. प्रथा, परंपरा, संस्कृती, लोकजीवन, कृषिकर्म, त्यासाठी लागणारी सामग्री हे सारेच लोकजीवनातून प्रतिबिंबित होताना दिसते. ग्रामीण लोकमानसाची समूहाने साधन निर्मिती करण्याची परंपरा संपूर्ण गावासाठी फलदायी असायची. 'साकव' हा लोकमानसाच्या अशाच साधन परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग दोन गावांना, कधी कधी दोन वाड्यांना जोडणारा तो दुवा ठरायचा.
पावसाळ्यात नदी-नाले दुथडी भरून वाहायचे, कधी कधी तर सतत पाऊस कोसळत राहिल्याने साधा ओहोळ ओलांडून दुसऱ्या वाड्यावरही जात येत नसे. अशा प्रसंगी पावसाळ्यात नदी, ओहोळ पार करण्यासाठी एकच माध्यम, तेही साकवाचे. 'साकव' तयार करण्यासाठी सिमेंट काँक्रीटची गरज नसते तर त्यासाठी निव्वळ नैसर्गिक साधने महत्त्वाची असायची. बाजारहाट करण्यासाठी, एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्यासाठी किंवा इतर कामांच्या निमित्ताने जाण्यासाठी साकवाचाच पुरेपूर उपयोग व्हायचा. साकव ही काही एकट्या दुकट्याने तयार होत नसे, तर ती समूहाच्या कष्टातून साकार होत असे. त्यासाठी विविध टिकाऊ झाडांच्या 'मेडी' तयार केल्या जात असे. पाणी लागून मेडी ठिसूळ होता काम नये याचीही दक्षता घेतली जात असे. बांबूंची साटी करून तिचा वापर मोठ्या खुबीने केला जायचा. मेडी, आडी, साटी यानां एकसंघ करून साकव तयार करण्यासाठी कणखर अशा राजवेलींचा वापर केला जायचा.
पाऊस सुरु होऊन तो धो धो कोसळायला लागला की बिनधास्तपणे नदीचे, ओहोळाचे पात्र ओलांडण्याची सवय कधी कधी घातक ठरायची. त्यावर उपाय म्हणून साकवाचा वापर व्हायला सुरवात झाली. साकव घालायचा झाला की संपूर्ण गाव एकत्रित व्हायचा. गावातील अनुभवी, जाणकार माणूस देवाला, जागेकराला नारळ, फुले वाहून गाऱ्हाणे घालायचा. लोकमानसाचा उत्साह, जोम, तरतरी व समूहाने कार्य करण्याची वृत्ती यातून साकव घालण्याचे कष्टप्रद कार्य लीलया पार पाडले जायचे.