पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.
कविता व गीत या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये फार फरक आहे. पहिली व सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कविता गाईली जाईलच असं नव्हे. तालासुरांवर गाता येणं हा काही कवितेचा विशेष मानला जात नाही. ज्यामुळे आपल्या मनास आल्हाद वाटेल आणि जिच्यात रचनेचं आणि आशयाचे म्हणजेच अर्थाचंही सौंदर्य असेल ती कविता. कविता आपल्या भावभावना मुळातून जागृत करते.गीतामध्ये स्वरांचा एक सुंदर मेळ साधलेला असतो. तो लक्षात ते जर कोणी गायलं तर मनोरंजन होतं. गीत योग्य ती वाद्य साथीला घेऊन गायलं तर दुधात साखर पडावी तशी मनोरंजनात भरच पडते. गीतामध्ये अर्थाचं सौंदर्य असेलच असं नाही, पण स्वरमधुर शब्दरचनेचं सौंदर्य असणं आवश्यक असतं.'गाणं' असाही एक शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा तुम्हाला स्वतःलाच गाणी गाण्याचा छंदही असेल. खरं तर गीत म्हणजेच गाणं - पण कधी कधी एखाद्या साध्या मजकुराचीही अशी रचना केलेली असते, की तो चालीवर शब्दरचनेचं सौंदर्य असतं ते तिथे नसतं.म्हणूनच मग 'गाणं' या शब्दाचा अर्थ कंटाळावाणा तोच तो मजकूर असाही होतो. उदाहरणार्थ, "मला आज संध्याकाळी तुझ्याबरोबर फिरायला ने असं एकच गाणं धाकट्या भावानं लावलं होतं". यातूनच मग कोणी स्वतःच्या दुःखाचं किंवा त्रासाचं रटाळ कथन करू लागला तर आपण त्यासाठी 'रडगाणं' असा शब्दप्रयोग करतो.'कवन' असाही एक शब्द आहे. कवन म्हणजे एखाद्या प्रसंगावर मुद्दाम केलेली रचना. अशी कवनं करणं व आपल्या राजास, धन्यास किंवा आश्रयदात्यास आनंदित करणं अशी एक परंपरा शाहीर मंडळींमध्ये होती.'पद' हा जुन्या काळचा काव्याचा विशिष्ट असा रचनाप्रकार होता. तुमच्या घरी 'पदे व आरत्या' या नावाचं एखादं जुनं पुस्तक असेलही. ते पाहा.'पद' या शब्दावरूनच 'पद्य' हा शब्द तयार झाला.जे चालीवर म्हणता येतं, गाता येतं ते 'पद्य' ठरलं. आणि जे असं तालासुरात गाता - म्हणता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो 'गद्य'. आता काय होत, की गाण्यानं, त्यातल्या सुरांनी आनंद होतो. तसा आनंद काही गद्य वाचल्याने होत नाही. म्हणून मग असं झालं की 'गद्य' या शब्दाला रुक्ष,कंटाळवाणं हाही अर्थ चिकटला.तुम्हाला शब्दांची ही असली गंमत कळलीच नाही तर मी म्हणेन "ही मुलंमुली फारच गद्य आहेत बुवा."