पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.
माझ्या समाजकार्याच्या निमित्ताने एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक लोकांची आर्थिक किंवा अन्य काही स्वरुपाची मदत करण्याची इच्छा असते. श्रीमंत लोक जास्त मोठी देणगी देत असतील, असा आपला समज असतो; पण ते तितकसं खरं नाही. त्याउलट मध्यमवर्गीय व कनिष्ट मध्यमवर्गीय लोकच सढळ हाताने मदत करतात.
काही वर्षांपूर्वी मला बंगलोरमधील एका मोठ्या कंपनीत व्याख्यानाचं निमंत्रण आलं. विषय होता - 'मोठ्या कंपन्यांची सामाजिक जबाबदारी'. माझ्या भाषणानंतर काही तरुण मुलंमुली मला येऊन भेटली. कंपनी चांगलीच श्रीमंत होती. कंपनीत काम करणारे सर्वच उत्तम परिस्थितील होते. स्वाभाविकच त्यांचे कपडे वगैरे उंची होते. माझ्या भाषणानंतर सर्वजण भारावून गेले होते. ‘मॅडम, आम्ही दर महिन्याला इतके कपडे विकत घेतो. या भूकंपग्रस्त लोकांसाठी आम्ही आमचे जुने कपडे पाठवले तर चालतील का? तुम्ही त्याची जबाबदारी घेऊन ते कपडे त्यांच्यापर्यंत पोहचते कराल का?” त्यांच्यापैकी काहींनी इतरही काही वस्तू देणगीरूपात देण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्या सर्वांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहून मला खूप आनंद झाला. रामाने जेव्हा लंकेत जाण्यासाठी सेतू बांधण्यास सुरवात केली, तेव्हा एका चिमुकल्या खारीने पुढे होऊन एका मुठभर वाळूची कशी मदत केली, या गोष्टीची मला आठवण झाली.
'तुम्ही जमा केलेल्या थैल्या माझ्या ऑफिसात पाठवून द्या. त्यातील गोष्टी योग्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची मी व्यवस्था करीन.'
त्यानंतर सुमारे आठवडाभरातचं शेकडो बॅगा येऊन पोहोचल्या. त्यानं माझं ऑफिस भरून गेलं. आपल्या भाषणाचा हा इतका चांगला परिणाम झालेला पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला. एका रविवारी मी माझ्या मदतनिसांना बरोबर घेऊन त्या बॅगा उघडण्यास सुरवात केली. आतून ज्या काही गोष्टी बाहेर आल्या, त्या पाहून आम्ही थक्क झालो. आम्हाला धक्का बसला. फाटक्यातुटक्या विजोड उंच टाचांच्या चपला, फाटकी अंतर्वस्त्रं, न धुतलेले शर्ट, झिरझिरीत सवंग साड्या, धड आकार वा रंग सुद्धा नसलेली खेळणी, वापरण्यायोग्य न राहिलेली अंथरुण-पांघरुणं, ॲल्युमिनियमची भांडी, फुटक्या कॅसेट्स अशा गोष्टींचा मोठा ढीग आमच्यासमोर तयार झाला. त्यात चांगले शर्ट, साड्या व वापरण्यायोग्य वस्तू अगदी थोड्याच होत्या.
एक गोष्ट उघडच होती. ज्या गोष्टी भंगारवाल्याकडे पोहोचवायच्या, त्या वस्तू या लोकांनी देणगीच्या नावाने माझ्या ऑफिसात पाठवून दिल्या होत्या. त्यादिवशी मला भेटलेले सर्वच स्त्री-पुरुष बुद्धिमान होते, भरपूर प्रवास केलेले, सधन लोक होते. अशा सुशिक्षित लोकांचं जर हे वागणं असेलं, तर मग अशिक्षित लोकांनी काय करावं?