पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
आजकाल खेड्यातला समाज कसा असतो याची मला काही कल्पना नाही. पण आमच्या काळी गावातील सामाजिक वातावरण कसं सरळ, साधं असे. एक दिवस आमची गाय हरवली होती. मला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो. आमची गाय गोपाळच्या गोठ्यात बांधून ठेवलेली असल्याची बातमी आमच्या कानावर आली. लगेच गावातील वडील माणसांनी त्याला पंचायतीत बोलावून घेतलं, गोपाळच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता व तो त्याच्यात भाज्या उगवायचा. त्या गावच्या बाजारात विकून जो काही पैसा हाती यायचा, तेवढंच काय ते त्याचं उत्पन्न. आमची गाय आमच्याकडून सुटून पळून गेली ती गोपाळच्या शेतात घुसली व तिने तिथे धुडगूस घातला. सगळ्या ताज्या भाज्या खाऊन टाकल्या, स्वाभाविकच गोपाळ संतापला आणि त्याने तिला गोठ्यात बांधून ठेवले. ते ऐकून आम्हाला वाईट वाटले. आम्ही त्याची नुकसान भरपाई देऊ केली. त्याने ते लगेच मान्य केलं व त्या गाईला सोडलं.
कुठे कायद्याची पुस्तकं कोणी उघडली नाहीत की कोणी वकिलाला बोलावणे धाडले नाही. पंचायतीने निर्णय दिला. नुकसान भरपाईची रक्कम ठरली व समस्या सुखासमाधानाने सोडवून टाकली. दोन्ही पक्षांमध्ये कुठेही शत्रुत्वाची भावन निर्माण झाली नाही.
मला आणखी एक घटना आठवते. आमच्या शेजाऱ्यांकडे एका मुलीचं आपल्या सासूशी पटत नव्हतं. तिची सासू तिला जाच करायची. ती तरुण सून गावच्या पाणवठ्यावर पाणी भरायला यायची. ती नाजुक आणि हळवी होती. पाणवठ्याच्या पायरीवर बसून ती मुळूमुळू रडायची. माझ्या आजीने असंच एकदा त्या मुलीला रडत बसलेलं पाहिलं. ती लगेच आमच्या शेजाऱ्यांकडे गेली आणि तिच्या सासुला म्हणाली, 'तुझ्या सुनेला जाच करू नको. तुझी मुलगी पण कुणाच्या घरची सून आहे. ही गोष्ट ध्यानात ठेव. तूही या घरची सून होतीस, तेव्हापासून मी तुला पाहत आहे. वरती पण एक कोर्ट आहे आणि तू इथं जे वागशील त्याचं उत्तर तुला तिकडे द्यावं लागेल. यानंतर तिच्या सासूने तिचे आचरण बदलले.