पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.
घरात तान्हुलं जन्माला आलं की आत्याबाई त्याचं नाव ठेवतात. पाळणा हलवतात. आलेल्या सुवासिनींना हळद-कुंकू लावतात. कानात गुडगुड करतात. पाळणा सजवतात. फुलानं, फुग्यानं, काच नळ्याच्या चांदव्यानं, कपड्याचा चिमणीनं, जन्म दिलेल्या आईची ओटी भारतात. खण- कोयरी देतात. नाव ठेवण्याचा कार्यक्रम हा असा असतो. हे मी माझ्या चौसोपी घरात पाहिलेलं होतं. त्या निमित्तानं घर सजवायचं, गोडधोड व्हायचं. गुळाची लापशी आणि गुळवणी गावाला वाटली जायची, मग कुणाच्या ही घरी बारसं असो. गावात ही रीतच पडलेली. बारश्यावरून एकदा मी माझ्या आईलाच कोड्यात टाकलं. ते कोडं तिला अखेरपर्यंत सोडविता नाही आलं. मी तिला विचारलं होतं, 'मुलाचं नाव जसं पाळण्यात झोपवून, गाणं म्हणून, घुगऱ्या वाटून ठेवतात तसं गावाचं नाव कोण ठेवतं आणि कसं ठेवतात? आता याचं उत्तर ती काय देणार?' आणि आता मला विचारलं तर मी तरी कसं देणार, नाही का? माझ्या गावाचं नाव पिंपळगाव. गावासारखाच गाव, जसं असतं तसं, पिंपळाची झाडं जास्त असतील असं वाटतं; पण ते देखील नाही. एकुलता एक पिंपळ, भला मोठा. जीर्णशीर्ण बुंध्याचा, घेर अवाच्या सव्वा. मारुतीच्या मंदिरासमोर त्याचं वास्तव्य. मंदिरातील घंटा रामप्रहरी पिंपळाच्या साक्षीनं वाजायची. ती पाचदा लागोपाठ वाजली की, समजावं बप्पाजी पाटलानं वाजविली आणि एकदाच पण जोरकस वाजली की, कळायचं रामदासी मास्तरनं वाजविली. भक्ताच्या तऱ्हाही खूप. जैनाच्या नेमण्ण्यानं शेतातून येता जाता मारुतीकडं बघून हात जोडावेत आणि पुढं सरकावं. मारुतीला सांगितल्याशिवाय, त्याच्याशी बोलल्याशिवाय गावाचं पान हलायचं नाही. पिंपळपानांची सळसळ आणि कावळ्यांनी काव काव एकात एक मिसळून जायची. पिंपळाला लागून असलेल्या पारावर रात्री सगळे जमायचे. भजनासाठी- कीर्तनासाठी कोळ्यापासून माळ्यापर्यंत जमले की, दगडू कोळी पेटीवर अन् कुलकर्णी मास्तर पखवाजावर. भजनात टाळ कुटण्यासाठी, चिपळ्यांचा आवाज काढण्यासाठी बाकीचे सगळे असायचे. काकड आरतीची वेळ होईस्तोवर टाळ-मृदुंगाच्या आवाजाची संथ साय गावावर पसरलेली असायची. नावाप्रमाणंच पिंपळगावात पिंपळाची जास्त झाडं असतील असा माझा बालसमज. शोधून सापडलं ते फक्त एक झाड. बाकी आणखी एक झाड होतं ते वडाचं. असंख्य पारंब्या फुटलेलं. आठवतं तसं सगळे सवंगडी तिथं सूरपारंब्या खेळायला जमा व्यायचे. विनापैशाचा खेळ. कधी लगुर तर कधी विटीदांडू. जमल्यास कबड्डी. या पलीकडं खेळ नाही. तसं म्हणावं तर खुराडं घातलेली एक तालीम होती. कुलकर्ण्यांच्या आळीत. तांबड्या मातीचा लळा नव्हता गावात कुणालाच. खाली मातीत गाडलेला एक मल्लखांब सवतीच्या लेकरासारखा मुकाट्यानचं सडून जाईपर्यंत उभा होता. दुसऱ्याला त्याच्या अंगाला चोपडलेलं एरंडाचं तेल दुसरा दसरा येईपर्यंत टिकून राहायचं. जिरून जायचं कारणचं नव्हतं. पोरासोरांनी खेळण्याऐवजी उंदीरच खेळून जायचे त्यावर. वर-खाली नुसती पळापळ. गावात एकतरी पहेलवान व्हावा अशी पाटलांची इच्छा होती. त्यांच्या श्वासात श्वास असेपर्यंत ती काही पूर्ण झाली नाही.