पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे दया.
आधुनिक जगातील सत्तेच्या वर्चस्वाची उतरंड हा कळीचा मुद्दा बनते. तंत्रज्ञानाचे श्रेष्ठत्व, आधुनिकता वर्चस्व गाजवते. शत्रुला अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवायचे, अन् मग आपल्या अटी एकतर्फी लादायच्या. दोन हजार वर्षांपूर्वी चिनी तत्त्वज्ञानी 'सून त्झू' याने युद्धशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. युद्धामध्ये शत्रुच्या मानवी शक्तीचे खच्चीकरण करण्यापेक्षा शत्रुसैन्याचे मनोधैर्य खच्ची करणे जयासाठी अधिक महत्त्वाचे आहे. मनाने हरलेले सैन्य सहज पराभूत होऊ शकते. हे सांगताना त्याने जणू विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाला डोळ्यांसमोर ठेवले असावे. आखाती युद्धात वापरली गेलेली इलेक्ट्रॉनिक शस्त्रे अन् क्षेपणास्त्रे यांचा एकत्रितपणे केला गेलेला मुबलक वापर पाहणे हे युद्धशास्त्राच्या माहितगारांना डोळ्यांना मेजवानी मिळाल्यासारखे होते. जणू एकविसाव्या शतकात युद्ध झाले, तर जगाच्या रंगमंचावर काय दिसेल याची झलक पाहायला मिळाली. क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक शस्त्रे, माहिती-तंत्रज्ञान हे जणू त्यावर प्रमुख भूमिका निभावणार आहेत.
आपल्या देशात ‘तंत्रज्ञान' म्हणजे अजूनही काळा धूर ओकणाऱ्या उंच चिमण्या आणि कर्कश आवाज करणारी अवजड यंत्रे हेच चित्र बहुसंख्य लोकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. हे विपर्यस्त चित्र आहे. मध्ययुगामध्ये घोड्याचा लगाम शोधला गेला अन् शेतीशास्त्रात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर कित्येक शतकांनी बेसामरची धातू वितळवणारी भट्टी बनली अन् मानवाने धातूला हवा तो आकार देऊन फार मोठी तांत्रिक झेप घेतली. तंत्रज्ञानामध्ये अशी काही संशोधने किंवा यंत्रे बनतात की त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग होतोच असे नाही; पण ज्ञान म्हणून ते मानवाला समृद्ध करत राहते. उदाहरण द्यायचे झाले, तर रसायनशास्त्रातील प्रक्रिया, मासे प्रजनन करतात ते शास्त्र, गवत उपटण्याचे, रोगी तपासायचे, वा इतिहास शिकवायचे, युद्धे करायचे वा थांबवायचे अशी अनेक देता येतील.
आज अधिकांश तंत्रज्ञान हे फिरत्या पट्ट्यापासून वा उघड्या भट्टीपासून दूर असते. इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश संशोधन अशा नव्या क्षेत्रांत तर शांतता आणि स्वच्छता प्रथम क्रमांकाची गरज असते. फिरत्या पट्ट्यापाशी उभी असलेली लहानसहान कामे करणारी माणसांची फौज हे चित्र कालबाह्य झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाला सोबत नेण्याआधी जनमानसातली ही तंत्रज्ञानाची कालबाह्य प्रतीके आधी बदलायला हवीत. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान, पचवूनच वाढते, अधिक पुढे जाते; स्वतः चा उद्धार स्वत:च करू शकते. एका अर्थाने तंत्रज्ञानातील प्रगती ही तीन टप्प्यांमध्ये एकमेकांत गुंतलेली वर्तुळाकार साखळी असते. पहिली निर्मिती अवस्था, ज्यामध्ये एखाद्या कल्पनेचा आराखडा असतो. मग तो आराखडा सत्यात उतरवला जातो आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर केला जातो. मग ते समाजात मिळून मिसळून जाते अन् जीवनाचा एक भाग बनते. इथे हे वर्तुळ पूर्ण होते. असे हे तंत्रज्ञान समाजात मुरले, की त्याची सवय होते आणि अधिक परिपूर्णतेकडे जाण्यासाठी नव्या कल्पना सुचतात. असे हे एकातून उद्भवणारे दुसरे वर्तुळ आहे. विकसित देशात या वर्तुळातील प्रत्येक टप्प्यातील वेळेचे अंतर कमी कमी होते आहे. आपल्या देशात आपण नुकते वर्तुळ पूर्ण व्हायच्या पायरीवर पोचलेलो आहोत.