पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.
रानातून ओढ्यात खळाळत पाणी वाहत येण्याइतका धुंवाधार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळं वाफसाच नसल्याने पुढं तिफण कशाची धरायची, हा नेहमीचा प्रश्न यंदाही ठाण मांडून आहे! शेतात औतं लावून पाळी घालून कुळकुळीत झालेलं रान अजून म्हणावं तसं भिजलेलं नाही, हे तेच तेच गाऱ्हाणं जन्माला लागेल की काय अशी भीती आता वाटतेय. पावसाची वाट पाहताना काढून ठेवलेली ईरली, घोंगडी कोनाड्यात पडून आहेत. कारण एकसलग आभाळ येतच नाही. त्यामुळं बोडक्या डोक्यानचं येणं-जाणं सुरु आहे. ओढ्याला पाणी येऊन त्यात जागोजागी 'येरुळे' दिसू लागतील तेव्हाच खरा पावसाला आला असं गावातलं सर्वसामान्य सूत्र ! आता पडणारं हे असलं भूरंगट किती जरी पडलं तरी त्याचा काही उपयोग नाही, हे गावकऱ्यांचे पावसाचे आडाखे. त्याला अजूनतरी कोणी छेद देऊ शकलेले नाही. पाझर तलावाच्या अंगाला असेलेलं मुरमाड रान मात्र अजून थोडेफार तापत्या अंगाचेच आहे. गावच्या पांदीत असलेली वडापिंपळाची झाडं एकमेकाला विळखा घालून सदैव झिम्मा खेळत असतात. पण दरसाली कमी होत चाललेल्या पावसानं त्यांचे चेहरे पिवळट होताहेत. त्यांच्या बुंध्यावरनं पाळणाऱ्या खारुताई आजकाल थोड्या बावरल्याहेत. असमान पावसानं झाडावरची साल निम्मीअर्धी ओलीसुकी झालीय. त्यांच्या सालीवरती सूरपारंब्या खेळणारे तिखट मुंगळे अजूनही एकाच रांगेत चालताहेत. मान ताठ करून बसलेले हिरवे-पिवळे सरडे भक्ष्यासाठी केव्हाचे दबा धरून आहेत. बेडकांचे घसे अजून ओले झालेले नाहीत. सुगरणींचे विहिरीतले खोपे अर्धे बांधून झालेत. मात्र त्यापुढची तयारी तिनं बंद केलीय. काही विहिरी अर्ध्या-मुर्ध्या भरल्यात, तर काही विहिरींतल्या कड्याकपाऱ्या काहीशा ओसाड झाल्यात. तळाला गेलेलं तिथलं पाणी मात्र बरंचसं वर आलंय. उनाड साळूंख्यांना कळेनासं झालंय, की पावसाची वीण उसवलीय का त्याचा हंगाम चुकलाय? कावळ्यानं बांधलेलं घरटं मात्र अजून शाबूत आहे. तर बाभळींनी माना टाकल्यात. चीलारीची मात्र चंगळ झालीय. धोतरासुद्धा दरदरून फुटलाय. बिनकामाचं तण जागीजागी आलंय.
शेरडांच्या केसांत अडकणारे केचवे वाढलेत. गायी-म्हशींच्या अंगावर गोचिडांचा आट्या-पाट्याचा खेळ सुरु आहे. डोबीतल्या चिखलातून जेव्हा म्हशी बाहेर यायच्या तेव्हा हळूच येऊन त्यांच्या अंगावर बसणारे बगळे यंदा गतसालापेक्षा घाटलेत. श्रावणात बेफाम उगवणारं हिरवंकंच कमालीचं कोवळं घास अजूनही तगून आहे. दर्ग्याच्या घुमटाभोवती, मिनाराभोवती फिरणारे पारवे अजून अबोलच आहेत. शिवाराच्या वाटेला असलेले चिरे निसटलेत. विजनवासातलं नागोबाचं एकाकी देऊळ मस्तकावर अविरत पडणाऱ्या पावसाच्या सलग धारा अजून कशा बरसल्या नाहीत म्हणून फणा काढून ताठून गेलंय. तिथल्या अरुंद, अंधाऱ्या गाभाऱ्यातल्या पाकोळ्या कधीच निघून गेल्यात, त्या फिरून परतलेल्याच नाहीत. रातसरी विहिरीजवळच्या रानात फिरणारे काजवेही अजून फिरकले नाहीत. रातकिड्यांनी मात्र विश्रांती घेतलेली नाही. साप-विंचू काट्यांना उधाण यायचंय.