पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
गावोगावी गूळ निर्मिती करणारी गुऱ्हाळे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती. सण-उत्सवाच्या प्रसंगी गोडधोड खाण्याची पिढीजात परंपरा असल्याने गोडधोडासाठी गूळ हा हवाच आणि त्यासाठी उसापासून गूळ निर्माण करणारी गुऱ्हाळे अनेक खेडोपाडी होती. सत्तरी, काणकोण येथे मोठ्या प्रमाणात गुळाची निर्मिती होत असलेली पाहिजे, हे 'गुळेली' या नावावरून स्पष्ट होते. या ठिकाणी असलेला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करायचा आणि पारंपरिक पद्धतीने गुऱ्हाळावर गुळाची निर्मिती करायचा. सत्तरीत गुळले, गुळेली या ग्रामनामांचा गुळाशी प्रकर्षाने संबंध आहे. वाळपई जवळ म्हाऊस गाव आहे. इथे कधीकाळी मोठ्या जातीचा ऊस होत असला पाहिजे व त्यावरूनच या गावाला म्हाऊस हे नाव प्राप्त झाले असावे. इथला ऊस बैलगाडीने झर्मेमार्गे गुळलेला आणला जात असावा.
म्हादई नदीच्या डाव्या काठावरती वाळपईहुन फोंड्यास जाताना गुळेली नावाचे गाव आहे. धामशे, भिरोंडा आदि परिसरात लावला जाणारा ऊस जलमार्गाने होड्यातून गुळेलीला आणला जायचा आणि तिथून तो अन्य ठिकाणी पाठविला जात असे. केपेतही कुशावती नदीच्या डाव्या काठावरती उसगाळीमळ नावाचे गाव आहे. तिथे होणारी उसाची लागवड गूळ निर्मितीसाठी पोषक ठरली होती. अशाप्रकारे गावागावातच लोकमानसाच्या गरजेच्या अन्नधान्याची निर्मिती केली जायची. खूप मोठ्या प्रमाणात चालू असलेली ही गुऱ्हाळाची परंपरा आज मोडीत निघालेली आहे. असे असले तरी काही भागात गुऱ्हाळासंबंधीचे लोकसंकेत आणि पारंपरिकता यांचे जतन केले जाते. नेत्रावळीसारख्या गावात लोकसंस्कृतीचे संचित जतन करणारी व्यक्तिमत्त्वे हे एक वेगळेपणच आहे.
पूर्वी गूळ तयार करण्यासाठी उसाच्या फाड्याजवळच ऊस मळण्यासाठी घाणा घालण्याची प्रक्रिया सुरु होत असे. पूर्वी हा घाणा लाकडी असायचा आणि त्यासाठी जांभळीचे लाकूड उपयोगात आणले जात असे. कोणतेही चांगले कार्य करण्यापूर्वी देवाचा कौल घेणे, त्याची पूजा करणे हे लोकमनाने आपले कर्तव्य मानलेले आहे. घाण्याजवळ नारळ ठेवून, दिवा लावून त्यानंतर पहिल्यांदा आलेला रस 'देवा रोस' अर्पण केला जात असे. त्यानंतर गुरा-वासरांना दिला जायचा आणि त्यानंतर लोकांना दिला जायचा. त्यानंतरच गुळाची निर्मिती प्रक्रिया सुरु करण्यात येत असे.