खाली दिलेला परिच्छेद वाचा आणि परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नमूद करा. ह्या प्रश्नांची उत्तरे परिच्छेदावर आधारित असली पाहिजेत.
माणूस हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा प्राणी आहे. हे त्याचे वेगळेपण केवळ दिसण्यापुरते आहे, असे नाही; तर त्याच्या या वेगळेपणाचे नाते थेट त्याच्या असण्याशी आहे. विशेषत: आकलन शक्तीशी आहे. मेंदूशी आहे. त्याच्या विचार करण्याच्या शक्तीशी आहे. माणसाला विचार करता येतो. त्याला चांगले-वाईट कळते. आणि ही गोष्ट माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र त्याचबरोबर माणसाचे माणूस असणे ही बाबही जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखी आहे. हे माणूस असणे फारच विचित्र आहे. काम, क्रोध, मोह, लोभ, मद व मत्सर हे सगळे विकार माणसांत आहेत. सगळीच माणसे या विकारांसह जगतात. फार तर तीव्रता कमी जास्त असते. मोह, प्रेम, क्षुधा, पिपासा,... या माणसांच्या ऊर्मी आहेत; हे कसं विसरता येईल? माणूस सहजप्रेरणांच्या प्रभावातून मुक्त होत नाही. माणसांनी काम, क्रोध, मोह, लोभ, मद व मत्सर हे मनुष्याचे दुर्गुण मानले; पण खरे तर ही माणूस असण्याची लक्षणे, तेव्हा त्यास केवळ दुर्गुण ठरवून मोकळे कसे होता येईल ? हा प्रश्नच. माणूस या लक्षणांसह जन्मतो, जगतो आणि मरतो. सत्य, परोपकार, अनालस्य, अनसूया, क्षमा आणि धैर्य हे माणुसकीचे गुण मानले जात असले; तरी वस्तुस्थिती अशी की, या गुणांचा माणसांत अभावच जास्तीचा आढळतो. माणसे वरील विकाराचे बळी ठरतात. हे बळी ठरणे सहज मानता येईल; मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गत: माणसात जसे विविध विकार आहेत, तसा प्रत्येक माणसाला एक मेंदू आहे. निसर्गाने माणसाला विचार करण्याची स्वतंत्र क्षमता दिली आहे, तरीही माणसे विचार न करता इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात, आपल्या विचार करण्याच्या क्षमतेचा वापर करत नाहीत. बौद्धिक-मानसिकदृष्ट्या गुलाम होतात. माणसाला लाभलेले शरीर आणि इंद्रिये लक्षात घेता माणसाने अशाप्रकारे इतरांचे गुलाम व्हावे, असा निसर्गाचा हेतू असण्याची बिलकूल शक्यता नाही. माणसाने तर्कनिष्ठ विचार करावा, आपल्या आणि इतरांच्या हिताचा विचार करावा, जाणीवपूर्वक विकारांवर नियंत्रण ठेवावे; असा निसर्गाचा हेतू नसेल का?
माणसाला विकारमुक्त करण्याचे स्वप्न पाहणे, म्हणे केवळ स्वप्नच होय. सामान्यतः माणूस विकारवश आहे. तो त्याच्या प्रेरणा-प्रवृत्तींसह जगत आला आहे, आणि जगताहे; हे नाकारता येणार नाही. सध्या माणसे आपली स्वतःची ओळख कोणत्या ना कोणत्या धर्म, जाती, पंथ, संघटना इत्यादीच्या आधाराने करून देताहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण माणसांनी हे विसरून चालणार नाही की, मानवी संस्कृतीचे अस्तित्व त्याच्या विकारवश जगण्यावर अवलंबून नाही तर त्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यावर अवलंबून आहे. तेव्हा माणसांनी जाणीवपूर्वक विकारांवर नियंत्रण ठेवणे आणि नाती, नीती पाळणेही आवश्यक आहे. अर्थात हे आपोआप घडणार नाही, पूर्वीही कधी घडले नाही. मानवी जीवनाच्या इतिहासात माणसांवर नियंत्रण ठेवणारी कोणती ना कोणती व्यवस्था होतीच, हे विसरता येणार नाही.
मानवी संस्कृतीचे अस्तित्व कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे.
(a) विकारांसह जगण्यात
(b) नाती - नीती न पाळण्यावर
(c) आपल्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यावर
(d) अनोळखी जीवन जगण्यावर