पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
मी चारपाच वेळा घरे बदलली, पण खऱ्याखुऱ्या अर्थाने माझी एकाच घराशी दोस्ती जडली होती. आणि ते आमचे कोकणातले घर! घराशी दोस्ती जडते, घराचा लळा लागतो हे अगदी खरे आहे! घर तुमच्याशी बोलते. दिवेलागणीची वेळ झाली, वातावरण कातर झाले, झाडांना उगीचच काही अनामिक भीती वाटू लागली आणि अशा वेळी तुम्ही घरी वेळेवर आला नाही, तर घर तुमची उत्सुक होऊन वाट पाहते. “अगो, हो अजून कसो येवूक नाय!" असे म्हणून मनात तळमळणाऱ्या म्हाताऱ्या आजीसारखे घर तुमची वाट पाहत मनात तळमळते. तुमची सारी सुखदुःखे, आशाआकांक्षा घराला कळतात! तुम्ही घराच्या स्वप्नात येता. तुम्ही प्रवासाला निघाला की घर तुमच्यासाठी मनोमन प्रार्थना करते! होय, घराला मन असते, आत्मा असतो, स्वप्ने असतात! घराशी तुमची दोस्ती जडते याचे कारणच मुळी हे आहे! मुंबईत मी दोन तीन वेळा घरे बदलली; पण कुठल्याही घराचा असा लळा कधीच लागला नाही. या घराच्या गुळगुळीत भिंती माझ्याशी कधीच बोलल्या नाहीत, मी रात्री झोपल्यावर हे घर माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवील असे मला कधीच वाटले नाही. भाडे वसूल करणाऱ्या भय्याला माझ्याविषयी जेवढे प्रेम किंवा आपुलकी वाटत होती, तेवढीच या शहरातल्या घरांना वाटत होती! मी उशिरा आलो तर हे घर आपली वाट पाहत असेल असे मला कधीच वाटले नाही! उलट असेच वाटायचे की एक दोन दिवस जर मी आलो नाही तर हे घर दुसऱ्या एखाद्या भाडेकरूकडून चक्क रुपये आणे पै मोजून घेईल आणि त्याला त्या चार भिंतींच्या आतली सुरक्षितता खुशाल बहाल करील! शहरातली ही घरे आजूबाजूच्या वातावरणापासून पार तुटून गेली आहेत अशी माझी उगीचच भावना होते. या घरासमोरचे एखादे झाड तोडले गेले, ती जागा उदास, भुंडी दिसू लागली, तर या घरांना कधी दुःख होईल ही कल्पनाच करवत नाही. या घरांचे आजूबाजूच्या झाडांशी कधी नातेच जुळ शकत नाही.
आमचे कोकणातले घर त्याच्या भोवतीच्या सृष्टीहून वेगळे करून पाहणे शक्य होत नाही. आमच्या घरासमोर एक फणसाचे मोठे झाड होते. फणस लागले की कडेवर गुटगुटीत मूल घेतलेल्या पुरंध्रीसारखे हे झाड दिसू लागे. मग आमचे घर वात्सल्याच्या भावनेने या झाडाकडे पाहते आहे असे वाटे. समोरची जास्वंदी किंवा कण्हेरी सुकू लागली की प्रथम काळजी वाटे या घराला. पणजोबांच्या स्वप्नात येऊन ते ही गोष्ट त्यांच्या नजरेस आणून देत असावे! आणि मग एक दिवस आजोबा अचानक ओरडत, “अरे, त्या जास्वंदीच्या पोराक् पाणी घाला रे.” कळशा घेऊन आम्ही घसाघस पाणी ओतले की, त्या जास्वंदीच्या अगोदरच घराच्या भिंतींतून, कौलारांतून गारवा झिणझिणत जाई! जास्वंदीच्या फांदीवर लालभडक फूल यावे, तसे घराच्या ओठांवर हास्य फुलून येई. जास्वंदी सुकत चालल्याची बातमी घरच पणजोबांच्या स्वप्नात जाऊन सांगते अशी माझी माझ्या बालवयात अगदी पक्की खात्री झाली होती!
कारण, पणजोबांच्या डोळ्यांत मोतिबिंदू पडले होते. त्यांना स्वतः काही पाहणे मुळीच शक्य नव्हते ! मग त्यांना ही गोष्ट कशी बरे कळत असावी?