पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
स्वतः अंगठा एकटा तर काम करतोच पण इतर बोटांच्या मदतीलाही जातो. तर्जनीला बरोबर घेऊन कधी दारात सुंदर रांगोळी काढतो तर कधी भांगेत “चिमूटभर सिंदूर" भरतो. राग आला तर कुणाला चिमटा घेतो आणि शांती मिळवण्याकरिता तर्जनीच्याच मदतीने ध्यान धारणा पण करतो.
“मूर्ती लहान, पण किर्ती महान” श्रेणीत येणारा, प्रचंड कामसू असणारा... प्रत्येक बोटाच्या मदतीला धावून जाणारा अंगठा, बाळाच्या तोंडात जाऊ नये म्हणून स्वतः कडे कडूपणा घेतो. अंगठा हे एकमेव बोट असं असेल, की ज्याच्या करता कुणी अंगठी बनवत नाही.
अंगठ्याजवळचं बोट तर्जनी. चार बोटांमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी. दुसऱ्यांकडे बोट दाखवणारी म्हणून खरं तर ती उगाच थोडी बदनाम झाली आहे. पण ती दुसऱ्यांकडे वळते, तेव्हा तीन बोटांना स्वतःकडे वळायला भाग पाडते. माणसाला दिशा दाखवते ती हीच. गालांवर ही ठेवून बसलं की विचारात गढल्याचा आभास निर्माण करता येतो. नको असलेल्या प्रश्न टाळायला ही क्रिया फारच उपयोगी ठरते. लहान बाळांना मोठ्या माणसांकडून पहिला विश्वास मिळतो, आधार मिळतो तो याच तर्जनीचा. आई बाबांचं हेच बोट धरून मूल घराबाहेर पहिलं पाऊल टाकतं आणि हेच बोट पकडून पुढे ते मूल शाळेत जातं. आवडलेला पदार्थ चाटून पुसून साफ करायला पण तर्जनीचं जिभेच्या आधी पदार्थांचा आस्वाद घेते.
मधलं बोट सर्वांपेक्षा मोठं म्हणून दादागिरी गाजवून तसं निवांत राहतं. पण गरज पडेल तेव्हा सगळ्यात मोठा बळकट आधार ह्याच दादा बोटाचा असतो. बघा एखादी जड वस्तु उचलून .... लहान बाळाला खेळवतांना अंगठ्याला हाताशी, नाही नाही...... बोटाशी धरून ते चुटक्या वाजवतं. आणि चार टाळकी एकत्र आली की कैरम खेळायला बसतं.
करंगळी शेजारच्या बोटाचा, अनामिकेचा तोराच निराळा. शेजारी भालदार चोपदार असल्याशिवाय ती उभीच राहणार नाही. कामही तिचं विशेष महत्वाचं, देवाला गंध लावण्याचं. विवाह बंधनात बांधून घ्यायला अंगठीही हिच्याच अंगावर.
करंगळी बोटांमध्ये सर्वात छोटी. हिचीही मूर्ती लहान, आणि अंगकाठीही अंगठ्यापेक्षा बारीक. लहान असल्यामुळे तिला कामं जरा कमीच सांगितल्या जातात. कधीतरी इतरांच्या मदतीला तिला आमंत्रण मिळत. वर्गात कंटाळा आल्यावर तर ती जास्तच उपयोगात येते. वर केली की पाच सात मिनिटांची सुट्टी सहज मिळवता येते. आपण गरीब मर्त्य मानव ..... आपल्याला लहान बोटाचा एवढाच लहान उपयोग करता येतो. भगवान श्रीकृष्ण महान. एका करंगळीवर त्यांनी अख्खा गोवर्धन पर्वत उचलला.
हातांची ही पाच बोटं, प्रत्येकाचा आकार वेगळा, स्वभाव वेगळा पण गुण्यागोविंदाने सगळे एकत्र काम करतात. तेव्हा कुणी लहान नाही की कुणी मोठं नाही. तर अशी ही पाच बोटांची कहाणी...... पाचही बोटं तुपात असतात तेव्हा माणसाला स्वर्ग दोन बोटं उरतो. हीच पाच बोटं गालावर उमटतात तेव्हा थोबाडात लगावून देतात, गालावरून फिरतात तेव्हा हळुवार प्रेम देतात. केसं धरतात तेव्हा झिंज्या उपटतात, केसांतून फिरतात तेव्हा शांती देतात. एकत्र होऊन बंद होतात तेव्हा सव्वा लाखांची ठरतात.