पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायांची निवड करा.
आपल्या संस्कृतीत वेगवेगळ्या निमित्तांनी वेगवेगळ्या वृक्षांची पूजा केली जाते. वेगवेगळ्या वृक्षांखाली वेगवेगळ्या देवांचा वास असल्याच्या कल्पनेमुळंही त्या त्या वृक्षांची पूजा केली जाते. आपणाला कदाचित कल्पनाही नसेल की अशा वृक्षांपैकी बाभूळही एक वृक्ष आहे आणि त्याचीही पूजा केली जाते. मृगाचा पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीतलं सगळं बियाणं रुजून येतं. रूजून आलेल्या बाभळीच्या रोपट्यांची मराठवाड्यात पूजा केली जाते. त्याला हिरवटीची पूजा म्हणतात.
उगवून आलेल्या सर्वच हिरळीची ती पूजा असते. पण प्रतिनिधी म्हणून बाभळीच्या रोपाची निवड केली जाते. जणू बाभूळ हे मराठवाडी माणसाचं रूप आहे. सर्व प्रकारच्या अभावांना सामोरं जात स्वतःला टिकवत वाढवत जाणारं बाभळीचं झाड मराठवाडी माणसाला आपलं प्रतीक वाटलं नाही तरच नवल.
औदुंबराखाली दत्तात्रेय, पिंपळाखाली मुंज्या तशी बाभळीच्या झाडाखाली सटवाई नावाची देवी राहते असा समज आहे. ही सटवाई म्हणजे आपलं नशीब लिहिणारी देवता. हिरव्या चोळीचा खण, नाडापुडी, लिंबू, कणकीचे दिवे या साधनांनी हिरवटीची पूजा बांधली जाते. ही पूजा करून परत येताना गरोदर बाईची उरभेट होऊ दिली जात नाही.
हारण्या गाईच्या जागेवर निघालेली बाभूळ ही अस्माईन बाभूळ होती. उंच आभाळावर तिचा भरपूर विस्तार होता. आई शक्यतो त्या बाभळीच्या फांद्या तोडू देत नसे. त्यामुळं तिचा विस्तार अमाप वाढला होता. याच बाभळीच्या झाडाखाली मी 'रानातल्या कविता', 'बनगरवाडी', 'गोतावळा', 'कोसला', 'शीळ', 'धग', 'माणदेशी माणसं', 'पाचोळा', 'जांभळढव्ह' अशी कितीतरी पुस्तकं वाचली आहेत. ही पुस्तकं आज पुन्हा वाचताना मला या बाभळीखाली केलेल्या पहिल्या वाचनाची आठवण येत राहते. माझा आठवी, नववी आणि दहावीचा अर्धा अभ्यासही मी याच बाभळीखाली केला. मी वाचताना, लिहिताना, चित्रं काढताना हे झाड साक्षी आहे. दरम्यान, शिक्षणाच्या निमित्तानं मला गाव सोडावं लागलं. सुट्ट्या सुरु झाल्या की मी गावाकडं झेप घ्यायचो. गावाकडं गेलो की त्या बाभळीच्या झाडाखालीच माझा दिवस जायचा. याच्या त्याच्या घरी जाऊन बसणं वा चकाट्या पिटीत बसणंही माझ्या स्वभावात नव्हतं. बाज, रेडियो, पुस्तक आणि हे बाभळीचं झाड हेच माझे सगेसोबती. नारायण सुर्वे यांचे सर्व कवितासंग्रह याच बाभळीखाली पुन्हापुन्हा वाचले. माझ्या बहुतेक सर्व आवडत्या लेखकांच्या पहिल्या भेटी-गाठी, लेखनाच्या रुपानं इथंच घडून आल्या.
माझं शिक्षण संपलं आणि पोटापाण्याच्या नोकरीसाठी मला कायमचं गाव सोडावं लागलं. क्वचित कधीतरी गावाकडं जाणं व्हायचं. गावाकडं गेल्यावर निर्मळ आनंदाच्या ऐवजी कुटुंबकलहाला सामोरं जावं लागायचं. मग मी गावाकडं जाण्याचाही मोह टाळू लागलो. कलहातून स्वतःच सगळं सोडून बाहेर पडलो. पण उरलेल्यांचा कलह संपलेला नव्हता. परवा कळलं की, या कलहाला ते बाभळीचं झाडंही बळी पडलं.