निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
माध्यमिक शिक्षणाचा प्रसार व त्यांच्या स्वरुपांत विविधता आणणाच्या दृष्टीने केलेली उपाययोजना यांच्या बाबतीत अनुकूल प्रतिक्रिया आढळते. परंतु महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाचा प्रश्न आला की मतभेदांना सुरुवात होते. गेल्या दहा वर्षांत विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संख्येत जी विलक्षण वाढ झाली तिच्या इष्टतेबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. या वाढीचा परिणाम शिक्षणसंस्थेतून बेसुमार गर्दी होण्यात झाला असून त्यामुळे अनेक शैक्षणिक दोष उत्पन्न झाले आहेत असे सांगण्यात येते. आमच्या महाविद्यालयात व विद्यापीठात दाखल होणार्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांत उच्च शिक्षण घेण्याची कुवतच नसल्यामुळे त्यांना आपला शिक्षणक्रम अर्धवटच सोडावा लागतो. त्यामुळे आपली पुष्कळशी सामाजिक शक्ती आज वाया जाताना दिसते. विद्यार्थ्यांच्या या वाढत्या संख्येमुळे इमारती, प्रयोगशाळा, वाचनालयें यांच्यावरही फार ताण पडत असल्यामुळे कोणाचीच पुरेशी सोय होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या संख्येच्या मानाने सांघिक जीवनाच्या ज्या संधी मिळावयास पाहिजेत त्या पण दिवसेंदिवस कमी होत आहेत, आणि शिक्षक विद्यार्थी संबंधही दुरावत चालले आहेत. शिक्षणाचा दर्जा अशा रितीने खालावत आहे, आणि पदव्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्याना निरनिराळ्या सोयी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांमध्ये केवळ पदव्यांचा हव्यास निर्माण करण्याकड़े महाविद्यालयांचा आणि विद्यापीठांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे. महाविद्यालयात पाळीपाळीनें वर्ग चालविणे, संध्याकाळची व रात्रीची महाविद्यालये सुरु करणे, भरपूर पदव्या देणे, पत्रव्यवहाराच्या द्वारा अभ्यासक्रमाच्या योजना सुरु करणे, या सर्वांमधून हीच प्रवृत्ति व्यक्त होते. या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठांकडून अपेक्षित असलेले ज्ञानदानाचे खरें कार्य होत नसून ती केवळ पदव्यांचा पुरवठा करणार्या पेढ्या बनत आहेत, असे आज कित्येकाना वाटू लागले आहे. संख्या आणि विस्तार यांच्या वेदीवर गुणांचा बळी दिला जात आहे.
केवळ पदव्यांच्याच मागे धाव घेण्याच्या विद्यार्थ्यांमधील या प्रवृत्तीस निर्बंध घालण्यासाठी काय उपाययोजना करावी या संबंधी अनेक वेळा चर्चा होते. आणि काही वेळा विद्यापीठातील प्रवेश मर्यादित करण्याच्या दृष्टीने किंवा केवळ पदवी मिळवण्याच्या उद्देशानेच विद्यापीठात येणार्या विद्यार्थ्याना त्यांच्या निश्चयापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने काही उपाय योजले जातात. विद्यापीठातील प्रवेशावर या ना त्या स्वरुपांत निर्बंध घालणे हा वरील उपायांपैकी पहिल्या प्रकारचा उपाय असून विद्यापीठाच्या पदव्या व कनिष्ठ नोकर्या यांचा संबंध तोडंणे हा दुसर्या प्रकारचा उपाय आहे. विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाकड़े वाहणारा प्रचंड ओघ थांबविण्यास हे उपाय कितपत यशस्वी होतील याबद्दल शंकाच आहे. तसेच याच उद्देशाने माध्यमिक शिक्षणात आणलेली विविधता प्रत्यक्षात कितपत उपयोगी पडेल हे सांगणे कठीण आहे. या प्रयत्नांना यश येण्याची एकंदरीने शक्यता कमीच दिसते. माध्यमिक शिक्षणाचा झपाट्याने होत असलेला प्रसार हे त्याचे एक महत्वाचे कारण असून त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गर्दी काही काळ तरी अशीच वाढत जाणार आहे. परंतु केवळ गरीबीमुळेच जे उच्च शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्याना विद्यापीठातून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा होणे इष्ट आहे. निरनिराळ्या शिष्यवृत्या ठेवून मर्यादित प्रमाणात आज ही गरज भागवली जात आहे. परंतु आवश्यक ती पात्रता किंवा कुवत नसतानाही जे महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवू इच्छितात त्यांना तेथे सहज प्रवेश मिळत असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येत जी बेसुमार वाढ झाली आहेत त्याचाच आज आपण विचार करावयास पाहिजे.