पुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
धर्माच्या कोणत्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तर आपल्याला असेच दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाही. धनाचे दान हे धर्मदृष्टीने केवढे पुण्य आहे? श्रीमंतांनी गरिबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे. पण येथल्या श्रीमंतांनी दाने कशी दिली? त्यानी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या. अन्नछत्रे घातली. त्यासाठी उत्पन्न नेमून दिले. पण रुग्णालयांसाठी, पाटबंधाऱ्यांसाठी, शेतीसुधारणेसाठी, तुरुंगसुधारणेसाठी, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणी दाने दिली नाहीत. याचा अर्थ असा होतो की, स्वत:च्या पारलौकिक कल्याणासाठी, पुण्यासाठी ही दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाही; पण त्या दीनांची कायमची उन्नती व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याचे त्याचा प्रश्न सुटत नाही, तो सोडविण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे अशी भावनाच कोणाच्या चित्तात येथे उदित झाली नाही. ती झाली असती तर येथे आमूलाग्र क्रांती झाली असती. पाश्चात्य समाज उत्कर्ष पावला तो त्या समाजाच्या धर्मबुद्धीला हे वळण मिळाले म्हणून. रॉकफेलर हे नाव आता जगप्रसिद्ध झाले आहे. त्याने केलेले दान या प्रकारचे आहे. नवकोटनारायण हा शब्द त्याच्या वर्णनाला थिटा पडेल. अपार, अगणित संपत्ती एवढेच म्हणता येईल आणि तरीही त्या संपत्तीची कल्पना येणार नाही, या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न येताच जॉन रॉकफेलर तरुण वयातच सर्व व्यवसायांतून निवृत्त झाला आणि आयुष्याची पुढली 45 वर्षे संपत्ती दान करण्यातच खर्च केली. रुगणलये, वैद्यकीय संशोधन, शास्त्रीय संशोधन, ग्रंथालये, सार्वजनिक इमारती, शांततेसाठी प्रयत्न करणारी मंडळे, धर्मसंस्था या सर्वांना त्याने कोटीकोटी रुपयांचे दान केले या दानामध्ये मानवजातीचे कल्याण हा एकच हेतू होता. ‘अखिल विश्वातला मानव’ हे त्याचे लक्ष्य होते.