निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
सांप्रत काळी हिंदु लोक गरीब व अज्ञानी आहेत, एतद्विषर्यी मी सिद्धान्त लिहितों कीं, संपदा आणि ज्ञान ही दोन्ही, जोपर्यंत यांस आपली स्थिती कळली नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाहींत. जरी हा देश उत्तम प्रकारचें उत्पन्न करणारा, व धनधान्यसमृद्धिकर्ता आहे, तरी या लोकांस त्याचें फळ नाहीं.
आतां पृथ्वीवर दुसरे अनेक देश आहेत. त्यांची अवस्थाही फार वाईट आहे. रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे दरिद्री आहेत; परंतु हे उदाहरण या देशास उपयोगी नाही. कारण कीं, हा देश पूर्वी कसा होता व हल्लीं कसा आहे, तें पाहून विचार केला पाहिजे. किती एक लोक असे आहेत कीं, मुसलमानांचे राज्यास नांव ठेवीत नाहीत; परंतु इंग्रजांचे राज्य विशेषेंकरून दरिद्रास कारण समजतात व त्यांस कांही नवीन शहाणपणाची युक्ति सांगितली, तर ऐकत नाहींत आणि म्हणतात कीं, आम्हांस आजपर्यंत या युक्ति कोठें होत्या? आजपर्यंत आम्ही दुःखी नव्हतो; आतां मात्र झालों, ते इंग्रजांमुळे झालों. यास्तव या युक्तीनें आमचें दारिद्र्य जाणार नाहीं, इंग्रज जातील तर मात्र जाईल. असे समजून युक्तीस बहुत लोक अगदीं मानीत नाहीत. फक्त हें राज्य वाईट, असें म्हणून संध्याकाळपासून उजाडेपर्यंत, आणि उजाडल्यापासून सारा दिवसभर जप करितात.
या प्रकारचे लोक आम्ही नित्य पहातों. तेव्हा अशा लोकांची समजूत पाडणें हे सर्वांहून अवघड आहे; परंतु पहा कीं, असा विचार करीत बसणें मूर्खपणाचें आहे. उद्योगास झटणें हा शहाणपणा आहे. दारिद्र्य आहे खरें, व तें पदोपदी वृद्धिंगत होत चाललें आहे. द्रव्यांचे साधन कमी होत चाललें आहे; परंतु अशा जपानें उपाय होणार नाही. जर विद्या व ज्ञान येणेंकरून आपलें दारिद्र्य कमी केलें, तरच होईल. ज्ञान जेथें आहे, तेथें सर्व पराक्रम आहे; परंतु हिंदु लोकांमध्ये एकमत असेल, तर या गोष्टी घडतील. आपल्यापासून आपली कंठाळ एखादा घेऊन गेला, तर जागेवर बसून शिव्या दिल्या तर कंठाळ येईल कीं काय? यास्तव जे नेणारे आहेत, ते परत देण्यास अनुकूल करण्याचे जे प्रयत्न असतील, ते करावे. ते तरी शहाणपणाखेरीज कसे सांपडतील, यास्तव शहाणपण मुख्य पाहिजे. त्याचे योगानें दारिद्र्य कमी होईल.
या देशांतील लोकांनी विलायतेस जावें, तेथें वस्ती करावी. विद्या शिकावी. जे श्रीमंत आहेत, त्यांनी या कामांत द्रव्य खर्चावें, तिकडील ज्ञानाची वृद्धि करावी. तिकडील कलाकौशल्य इकडे आणावे; आपल्या दुष्ट चाली सोडाव्या, हेच शहाणपण आहे. या शहाणपणानें लोकांस समर्थता येईल. आणि समर्थतेनंतर दारिद्र्य जाईल. मुख्य ज्ञानापासून सर्व पराक्रम आहेत. कधीं कधीं ज्ञानाबरोबर लागलेच पराक्रम दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. कारण कीं, किती एक मूर्ख असून, अधिकार पावतात, तेव्हा त्यांस अधिकार कसा मिळाला? हा प्रश्न बहुतेक हिंदु लोक करितात; परंतु हा केवळ पोरकट प्रश्न आहे. पराक्रमाची रीति अशी आहे कीं, जो कोणी घरांत प्रमुख शहाणा असतो, तो बहुत द्रव्य संपादन करतो. नंतर त्याचे विभाग पश्चात् किंवा केंव्हा तरी होतात. तेव्हा त्यांतील एक विभाग अयोग्य पुरुषाच्या हातीं लागतो, म्हणून कोणी जर असें म्हटलें कीं, हें सर्व मूर्खपणानें संपादन केलें आहे, तर ही गोष्ट सत्य नाहीं.