Comprehension Passage
“विद्यार्थी माट्यांना प्रिय होतेच. परंतु विद्यार्थिनींविषयी त्यांना विशेष ममत्व वाटत असे. आजवर नाना तऱ्हेच्या बंधनांनी जखडलेली स्त्री आता हातपाय हलवत आहे, वैचारिक स्वातंत्र्याच्या मुक्त हवेत श्वास घेऊ लागली आहे, शिकून शहाणी होत आहे, धडपडून आपल्या पायावर उभी राहू बघत आहे, याचा त्यांना फार आनंद होई. आमच्या कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याने एका मुलीशी काही वावगी सलगी करण्याचा प्रयत्न केला. तिला ते अपमानकारक वाटले तिने त्याला चपलेचा प्रसाद दिला. त्या विद्यार्थिनीच्या या कृत्याचे माट्यांना इतके कौतुक वाटले की तिच्या धाडसाचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर, आपल्या सर्व पुस्तकांचा संच आपल्या सहीनिशी त्यांनी तिला भेट म्हणून दिला. व्यक्तिशः माट्यांनी आपल्याला काय दिले याचा जेव्हा मी आज विचार करते, तेव्हा अनेक गोष्टी मला आठवतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला जातीयतेकडे बघण्याचा एक स्वच्छ, निर्मळ दृष्टिकोन दिला. मी ब्राह्मणेतर समाजातली आहे, हे त्यांना माहीत होते. माझे त्यांना कौतुकही वाटे. पण ते जादा कौतुक नव्हते. त्यामुळे मागासलेल्या वर्गातल्या माणसांत जो एक लाडावलेपणा, एक विचित्र आणि उफराटा अहंगड निर्माण होतो, तो माठ्यांच्या या वागणुकीमुळे माझ्यात कधी निर्माण झाला नाही. हे त्यांचे ऋण केवढे मोठे आहे ते आज मला उमगते. विद्यार्थिदशेत माझ्या संकोची स्वभावामुळे मी माट्यांच्या खास आवडत्या विद्यार्थ्यांचे जे वर्तुळ होते, त्यात कधी प्रविष्ट होऊ शकले नाही. त्यांच्याप्रमाणे मी माट्यांना 'बापू' असेही सलगीने संबोधले नाही. मी त्यांना 'सर' असेच म्हणे. तरीही त्यांनी मला फार ममता व स्नेह दिला. विशेषतः ते मला 'शांते' अशी जी अनौपचारिक जिव्हाळ्याने ओथंबलेली हाक मारत, ती मला फार आवडत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी विद्यार्थिदशा संपल्यावरच माझे आणि माटे यांचे संबंध अधिक दृढ झाले. एव्हाना मी थोडेसे लेखन करू लागले होते. त्यामुळे असेल कदाचित. मी माट्याच्या घरी जाऊ लागले. धिटाईने एखादे वाक्य त्यांच्याशी बोलू लागले. एकदा कशी कोण जाणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनमाला तयार करण्याची कल्पना माट्यांच्या डोक्यात आली. कदाचित ते काम त्यांच्यावर कुणी सोपवलेही असेल. पण त्या सुमाराला मी माट्यांच्या घरी सहज गेले असता ते मला म्हणाले, “आलीस ? बरं झालं. ये अशी. इथं बैस अन् मला दोन-तीन कविता लिहून दे.” मी थक्कच झाले. प्रत्यक्ष माट्यांसमोर बसून कविता लिहून द्यायच्या ? ते कसे शक्य होते ? पण त्यांच्याशी जरा चर्चा केल्यानंतर त्यांना काय हवे होते, ते मला उमगले. विद्यार्थ्यांसाठी बाळबोध, प्रासादिक आणि मुख्य म्हणजे उपदेशपर असे पद्य त्यांना माझ्याकडून लिहून हवे होते. मी त्यांना दोन वृत्तबद्ध कविता लिहून दिल्या. बारीक डोळे करून त्यांनी त्या वाचल्या आणि खूष होऊन म्हणाले, “वा ! छान ! असंच लेखन हवं होत मला !” मी मनातून काय ते समजले.”
माट्यांना कशाचा आनंद वाटत होता ?
1
लेखनाचा
2
स्त्रिया हातपायहालवत असल्याचा
3
स्त्रिया स्वावलंबी बनत असल्याचा
4
पुरुषांना मारत असल्याचा