पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.
मराठी ही महाराष्ट्रीय आणि मराठी मनांची भाषा आहे. साक्षर व निरक्षर असा कुठलाही माणूस इथे मराठीतून आधी व्यक्त होतो. मातृभाषा म्हणून विविधता जपणाऱ्या महाराष्ट्रात मराठी मात्र मध्यभागी असेलली भाषा आहे. आमच्या शाहिरांचे पहाड हादरवून सोडणारे नाद मराठीत आहेत. लोकसंस्कृतीची अमृतगोडी मराठीतच आहे आणि भारुडांचे रोकडे प्रबोधन हेही मराठीतच आहे. लोकसंगीताचे व लोकरंगभूमीचे प्रचंड आविष्कार हेही मराठीतच आहेत. कीर्तन असू द्या की तमाशा असू द्या, या लोकसमूहाविष्कारांनी मराठीला आणि मराठी माणसाला सतत ज्ञानरंजनाचे अमृतच पाजल्याचे इतिहास सांगतो आणि वर्तमानही याच आवाजात समाजाशी बोलताना आढळतो. मनातले गूज मराठीतच आणि जनसंवाद हाही मराठीतच साधला जातो. म्हणून मराठी जशी शाळा ते विद्यापीठांची शिक्षणाची भाषा बनते, यापेक्षाही महाराष्ट्र मनांची ती जास्त जवळची भाषा आहे. हे स्वीकारावेच लागेल. मराठी भाषा गौरवाच्या दृष्टीने हा धागा जास्त महत्वाचा गणला जातो.
साहित्य घ्या, समाज घ्या, अथवा कला, संगीत, नाट्य, चित्रपट, रंगभूमी, व्यवहार, बाजारपेठा, सणोत्सव अथवा भाषा दळणवळण या सर्वच क्षेत्रांत मराठी म्हणून असलेले या भाषेचे स्थान निर्विवाद व व्यापक आणि प्रभावी आहे. लोकसाहित्य आणि स्त्रिया, शेती आणि माणूस, बाजारपेठा आणि समाज, ग्रामसंस्कृती आणि समाज किंवा एकूण वर्तमान आणि मराठी भाषा. यासंदर्भात मराठीचे प्रभावक्षेत्र फारच विशाल आहे. आमचे शिक्षणाचे लढे किंवा एकूण चळवळींचा प्रवास किंवा साहित्यातील बोलीभाषांचा आढळ, याशिवाय कीर्तनाची आमची परंपरा आणि तमाशे दणकट प्रभावी आविष्कार या सर्व अभिव्यक्ती मराठी भाषेला वगळून नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. मराठीची क्षमता आणि तिचे मराठी माणसासोबत असणारे अक्षर ऋणानुबंध हेच वरील विविध उदाहरणांतून स्पष्ट होतात, साधी गोष्ट घ्या, खेड्यांतला माणूस ज्या ज्या जिवंत बोलीभाषेत व्यक्त होतो, त्या मराठीचा दिमाख आणि तिचा अत्यंत सुंदर डौल जगात कुठेच नसावा.