निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
भारत एक राष्ट्र आहे. भारतातील जनता एक आहे. हे आज नव्याने सांगण्याची गरज नाही. हजारो वर्षांचा इतिहास याला आहे. केवळ भौगोलिक दृष्टीने नव्हे तर ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिनेही हे सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे. इतिहासपूर्वकाळापासून भारताची ही एकता प्रस्थापित झालेली आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते बंगाल-आसामपर्यंतचा हा भूप्रदेश सलग आहे. एकसंघ आहे. या भूमीची जनता एकाच मातीची आहे. त्याच मातीतून ती जोपासली गेलेली आहे. या मातीतून निर्माण झालेल्या संस्कृतीचा सुगंध तिच्या मनात दरवळत राहिलेला आहे.
गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी आणि तुंगभद्रा या नद्यांचे आशीर्वाद जनतेला विवाह मंगलात मिळालेले आहेत. त्यांच्यातील पाण्याने भारतातील प्राचीन नृपतिंच्या शिरावर राज्यरोहण प्रसंगी अभिषेक होऊन ते पावन होत असत. उत्तर भारतातील भगवान रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्या नामस्मरणाने आणि भक्तीने केवळ उत्तर-भारतीयांचीच नव्हे तर दक्षिण-भारतीयांचीच अंतःकरणे उचंबळून येतात, हे जितके खरे आहे तितकेच दक्षिण भारतातील आमच्या आचार्यानी भारतीय संस्कृतीचा ध्वज केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तरेतही मोठ्या डौलाने फड़कत ठेवला आहे, हेही खरे नाही काय? गंगेची कावड रामेश्वरला पाठवण्यात व रामेश्वरचा सेतू गंगेत सोडण्यात ही जनता स्वतःला कृतार्थ समजते. तिच्या सांस्कृतिक एकात्मतेची ग्वाही देण्याला आणखी काय पाहिजे? सांस्कृतिकदृष्टया एकात्म असलेल्या या राष्ट्रावर अनेकानी स्वार्या केल्या, अनेक राज्ये आली आणि गेली. पण या एकत्मतेत खंड पडला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी घडलेल्या अनेक चित्तथरारक आणि रोमहर्षक प्रसंगातून याचीच प्रत्ययकारी जाणीव सर्व जगाला झाली नाही काय? बंगालची शकले करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा महाराष्ट्रातील लोकमान्यांनी उग्र चळवळ केली आणि जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा सगळा देश पेटला हे तरी कशाचे लक्षण आहे?